श्रीगुरु नथुराम बाबा केहाळकरांनी वारकरी संप्रदायाला समयोचित पुढे नेले-इंद्रजित भालेराव
प्रेमसिंधु--जीवनचरित्राचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न संपन्न

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)-:ह. भ. प. नथुराम महाराज केहाळकर यांनी वारकरी संप्रदायाला समयोचित पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या कठोर साधनेने आणि सखोल अभ्यासाने त्यांना ऋषितुल्य स्थान प्राप्त झाले. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता आणि त्यांचे धवल चारित्र्य अनुकरणीय आदर्श ठरले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘प्रेमसिंधू’ या जीवनचरित्राचा प्रकाशन सोहळा श्री मैनापुरी देवस्थान पुंगळा (ता. जिंतूर) येथे मंगळवार दि.२५ मार्च,२०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ह. भ. प. डॉ. तुकाराम महाराज ठाकुर बुवा उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. मुकुंद सावजी कळमकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झाले.
प्रकाशनप्रसंगी बोलताना कवी संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित भालेराव म्हणाले, “श्रीगुरु हभप नथुराम महाराज यांचे जीवन हे प्रेमाचा महासागर होते. म्हणूनच या चरित्राचे नाव ‘प्रेमसिंधू’ समर्पक आहे. लेखनाचा कोणताही अनुभव नसलेल्या ह. भ. प. नारायण महाराज पांगरीकर यांनी २००-३०० पानांचे हे जीवनचरित्र लिहिणे हे प्रसादासारखेच आहे. या ग्रंथामुळे श्रीगुरु ह.भ.प. नथुराम महाराजांच्या पवित्र स्मृती चिरंतन राहतील,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. संगीता घुगे यांनी केले, तर सूत्रसंचालन खुशाल मुंढे यांनी समर्थपणे पार पाडले. आभार युवकमित्र ह. भ. प. नारायण महाराज पांगरीकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरीनाथ देवस्थान संस्थान पांगरी आणि गावकरी मंडळी पांगरी यांनी विशेष परिश्रम घेतले.