एचआरसी संस्थेतर्फे विधवेस उदरनिर्वाहासाठी गिरणी भेट:मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाचीही स्विकारली जवाबदारी
रामनवमी निमित्त राबवला स्तुत्य उपक्रम!!!

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)— होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च & चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने आज रामनवमीच्या पूर्वसंध्येला दि 5 एप्रिल रोजी जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील राधिका साहेबराव जगताप या निराधार विधवा ताईस उदरनिर्वाहासाठी 2 इन वन डाळ/पिठाची गिरणी भेट दिली. तसेच एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक किराणा साहित्य देऊन मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत शैक्षणिक किट भेट दिले.
याप्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, वैभव वट्टमवार, प्रकाश डुबे, राजेश्वर वासलवार, शा.स.व्य. अध्यक्षा अश्विनी उपाध्ये शिक्षक व गावातील नागरीक उपस्थित होते.
*पार्श्वभूमी*: जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील साहेबराव देशमुख या तरुणाचे 12 दिवसांपूर्वी फुफ्फुसांच्या विकाराने निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी व दोन आपत्ये अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. त्या कुटुंबास स्वतःची शेती किंवा जमीन काहीही नसून शेतात मोलमजुरी करून कसे बसे त्यांच्या कुटुंबाची जगण्यासाठी धडपड चालू आहे. त्या निराधार विधवा ताईची मोठी मुलगी पाचवीत तर मुलगा पाहिली इयत्तेत शिकत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील बिकट बनला आहे. निराधार ताईंचे सासरे 3 वर्षापूर्वी वारले,आता पतीचे निधन तर सासूबाई आजारामुळे अंथरुणला खिळल्या असल्यामुळे त्या मोठ्या आर्थिक विवंचनेत आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगळा चे शिक्षक प्रकाश डूब्बे यांनी आज तातडीने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली आणि फोनवर या कुटुंबाची कैफियत एचएआरसी संस्थेकडे मांडली. त्या कुटुंबास उदरनिर्वाहाचे साधन म्हणून डाळ/पिठाची गिरणी व दोन्ही मुलास शैक्षणिक किट देण्याचे आवाहन केले.
लेकरांचं दातृत्व आणि लोक सहभाग:पुंगळा येथील सहावीत शिकणाऱ्या प्रथमेश जगताप आणि श्रीनिवास जगताप या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बचत केलेल्या पैशांची देणगी देऊन मदतीचा दिला त्याबद्दल गावकऱ्यातर्फे त्यांचे कौतुक होत आहे. तसेच अतुल जावळे, अंबरेश्वर राठी, हार्दिक ठाकर, अलोक जोशी, प्राचार्य श्रीधर भोंबे, वासुदेवानंद प्रभु, बद्रीविशाल सोनी,मीनल मोहन बालगरकाशी, डॉ श्रीनिवास केशेट्टी या दात्यांनी सहयोग दिला.
पतीचे निधनाने संसार चालवण्याची जबाबदारी एकटीवर आली, घरात आर्थिक परिस्थिती बिकट, रोज मजुरी करून संसार चालवत असते,आज मला डाळ गिरणी स्वरूपात मदत मिळाल्याने मी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणार असल्याची भावना यावेळी महिलेने व्यक्त केली. – राधिका साहेबराव जगताप